11/07/2024
१२ मार्च २०२४. स्थळ राजकोट. हे शब्द आहेत रवीचंद्रन अश्विनचे
५००व्या विकेटचं सेलिब्रेशन होऊन मी हॉटेलवर माझ्या खोलीत आलो. तेवढ्यात मला आईला बरं नसल्याचं बायकोकडून कळलं. तिला एकदमच बरं वाटत नसल्याने तिला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आलं होतं. ती शुद्धीत आहे का? मी पाहू शकतो का असं मी डॉक्टरांना विचारलं. त्यांनी आता तुम्ही न पाहिलेलंच बरं असं सांगितलं. माझ्या काळजात धस्स झालं. माझ्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. मला काय करावं ते कळेना. काही मिनिटांपूर्वी मी ५००वी विकेट पटकावली होती. आता माझ्या डोळ्यासमोर मी या मालिकेसाठी निघताना आईला भेटलो ते आठवलं. मी थिजून गेलो. तेवढ्यात माझ्या खोलीत राहुलभाई आणि रोहित आले. त्यांनी मला सावरलं. रोहितने मला सांगितलं, तुला तातडीने निघायला हवं. तुझी घरी गरज आहे. मॅचचं काय असा प्रश्न माझ्या मनात येण्याआधी तो म्हणाला, मॅचचं आम्ही बघतो. तू बॅग भर. राजकोटचा एअरपोर्ट छोटासा आहे. संध्याकाळी ६ नंतर तिथून विमानं जा ये करत नाहीत. रोहितने बीसीसीआयच्या माध्यमातून राजकोटहून चेन्नईला जायला चार्टर्ड फ्लाईट अरेंज केलं. मनातले सगळे विचार थांबव आणि लगेच निघ असं रोहितने सांगितलं. मी तयार होऊन लाऊंजमध्ये पोहोचले तर दोन माणसं तिथे माझी वाट पाहत होती. एक सेक्युरिटी टीमचा माणूस होता आणि दुसरा होता फिजिओ टीममधला कमलेश. कमलेश माझा चांगला मित्र आहे. आम्ही एअरपोर्टच्या दिशेने निघालो. मी कसा आहे विचारायला रोहितचा कमलेशला कॉल आला. जोवर माझी घरच्यांशी भेट होत नाही तोवर तू त्याच्याबरोबरच थांब असं रोहितने कमलेशला सांगितलं. मी चेन्नईत उतरून हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. काही दिवसात सुदैवाने आईची तब्येत स्थिर झाली. चिंता मिटली. या संपूर्ण काळात रोहित संपर्कात होता. माझी आणि घरच्यांची विचारपूस करत होता. मी कर्णधार असतो आणि एखाद्या खेळाडूच्या बाबतीत असं झालं असतं तर त्याची घरी जाण्याची व्यवस्था केली असती पण तिथून निघाल्यानंतर घरी पोहोचल्यावर आणि नंतरही विचारपूस, काळजी कोण करतं? या स्वार्थी जगात दुसऱ्याच्या कठीण प्रसंगात ठामपणे उभी राहणारी माणसं कुठे असतात? मी रोहितच्या रुपात तो माणूस पाहिला. कर्णधार म्हणून, खेळाडू म्हणून त्याच्याप्रति आदर होताच पण या प्रसंगामुळे माणूस म्हणून त्याच्याप्रति असलेला आदर दुणावला. तो माणसांसाठी असं काही करतो की ते त्याच्यासाठी सर्वस्व देऊ शकतात.
स्थळ- दुबई, आयपीएल फायनल २०२० नंतरचे क्षण
दुबईत आयोजित आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाने जेतेपदावर नाव कोरलं. जेतेपद पटकावल्यानंतर मुंबई संघाने सेलिब्रेशन केलं. पत्रकार परिषद झाली. बाकी मीडिया कमिटमेंट्स पूर्ण करून कर्णधार रोहित शर्मा ड्रेसिंगरुममध्ये परतत होता. वाटेत त्याला मित्र आणि संघातील सहकारी धवल कुलकर्णी भेटला. धवलच्या कडेवर त्याची मुलगी होती. रोहितकाकाला पाहून ती चिमुरडी हसली. तो तिच्याशी खेळू लागला. खेळता खेळता विचारलं, तू झोपली नाहीस अजून? तिला कुरवाळून, थोपटून रोहित पुढे निघाला. दोन महिन्यांची स्पर्धा, जेतेपद पटकावण्याचं दडपण, तणावपूर्ण फायनल, पुढचे सोपस्कार या सगळ्यानंतरही रोहितमधला काका जागा होता. बराच उशीर झालाय, तू अजून झोपली नाहीस का असा आस्थेवाईक प्रश्न त्याने विचारला.
स्थळ- राजकोट, सर्फराझ खानचं पदार्पण
खाचखळग्यांची वाट पार करत मुंबईकर सर्फराझ खानने इंग्लंडविरुद्धच्या राजकोट कसोटीत पदार्पण केलं. या सामन्याला सर्फराझच्या घरचे उपस्थित होते. सर्फराझचे बाबा हेच त्याचे प्रशिक्षक आहेत. सर्फराझला भारताची कॅप देण्यात आल्यानंतर रोहित त्याच्या घरच्यांच्या दिशेने गेला. सर्फराझचे बाबा भावुक झाले होते. त्यांचा हात हातात घेत रोहितने त्यांचं अभिनंदन केलं. रोहित त्यांना म्हणाला, ही कॅप जेवढी सर्फराझची आहे, तेवढीच तुमची आहे. तुम्ही त्याच्यासाठी किती संघर्ष केला आहे ते आम्ही पाहिलं आहे. तुम्हा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. यावर सर्फराझचे बाबा म्हणाले, माझ्या मुलाला तुमच्याकडे सोपवतो आहे. सर, प्लीज त्याची काळजी घ्या. यावर रोहितने बिल्कुल बिल्कुल म्हणत त्यांचं पुन्हा अभिनंदन केलं. कसोटीदरम्यान या संवादाबाबत रोहितला विचारलं तेव्हा तो म्हणाला, मी सर्फराझच्या वडिलांबरोबर क्रिकेट खेळलो आहे. त्यांनी सर्फराझसाठी खूप कष्ट घेतले आहेत. सर्फराझ भारतासाठी खेळणं ही त्यांच्यासाठी प्रचंड भावुक करणारी गोष्ट आहे. मी त्यांच्या भावना समजू शकतो. याच कसोटीदरम्यान सर्फराझ फॉरवर्ड शॉर्ट लेग आणि सिली पॉइंट या बॅट्समनच्या अगदी जवळच्या ठिकाणी उभं राहून क्षेत्ररक्षण करत होता. स्पिनरच बॉलिंग टाकणार आहे त्यामुळे सर्फराझ हेल्मेटविना फिल्डिंग करणार होता. स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रोहितने त्याच्या बंबईया हिंदीत बॉलरला थांबवलं आणि सर्फराझला सांगितलं, ए भाई, यहाँ हिरो नही बनने का. सर्फराझसाठी हेल्मेट येईपर्यंत रोहितने खेळ थांबवून ठेवला. आपल्या तरुण सहकाऱ्याच्या सुरक्षेची काळजी रोहितने केली. उत्साहाच्या भरात जीवघेणा प्रसंग ओढवू शकतो हे ओळखून रोहितने त्याला समजावलंही. भलतं धाडस करू नकोस हे त्याला समजेल अशा शब्दात बोलला.
स्थळ- बार्बाडोस २०२४, वर्ल्डकप पटकावल्यानंतर राहुल द्रविड
वर्ल्डकपसह भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपला. रोहितबद्दल काय सांगाल, काय मिस कराल असं विचारल्यावर द्रविड म्हणाले, तो ग्रेट प्लेयर आहे, चांगला कॅप्टन आहे ते सगळं आहेच पण मी माणूस म्हणून त्याला सर्वाधिक मिस करेन. त्याने ज्या पद्धतीने मला आदर दिला. संघातल्या प्रत्येकाची काळजी घेतली. सगळ्यांना जोडून ठेवलं. आता आमच्या भेटी कमी होतील पण तो माझा सदैव मित्र राहील. तासाभरानंतर भारतीय संघाच्या ड्रेसिंगरुममध्ये बोलताना द्रविड म्हणाले, तुम्हा सगळ्यांबरोबर काम करताना अतिशय मजा आली. कर्णधार रोहितशी खास नातं निर्माण झालं. कोच आणि कॅप्टन यांच्यात सतत संवाद होतो. आम्ही चर्चा करायचो, एखाद्या मुद्यावर आमचं एकमत व्हायचं, कधी एकमेकांचं पटायचंही नाही पण तू माणूस म्हणून खास आहेस. रो, वनडे वर्ल्डकप हरल्यानंतर मला कोचपदी राहायचं नव्हतं. तू फोन केलास, कोचपदी राहावं असा आग्रह धरलास. त्यामुळे मी थांबलो. त्या फोनसाठी खरंच थँक्यू यू.
राहुल द्रविड यांचं नाव सार्वकालीन महान खेळाडूंमध्ये घेतलं जातं. खेळाडू इतकंच माणूस म्हणूनही त्यांना वाखाणलं जातं. त्यांना रोहितप्रति किती आदर आणि आपुलकी आहे हे वर्ल्डकपनंतरच्या प्रत्येक व्हीडिओत दिसून आलं. ५०वर्षीय द्रविड यांच्या मनात जो ऋणानुबंध रोहितने निर्माण केला आहे तोच नुकतंच भारतीय संघात दाखल झालेल्या खेळाडूच्या मनातही आहे. हरभजन सिंग सामन्यापूर्वीच्या कार्यक्रमात बोलताना म्हणालेला, रोहित यारों का यार आहे. त्याने केलेल्या धावा, रेकॉर्ड, जेतेपदं हे कौतुकास्पद आहेच पण बंदा माणूस म्हणून खरा आहे. आजही त्याच्या जुन्या मित्रांशी तसंच बोलतो. तसाच वावरतो. हरभजनचं म्हणणं खरं आहे. सोशल मीडियाने व्यापून टाकलेल्या जगात लोक फोटोलाही फिल्टर लावतात. रोहित अनफिल्टर्ड आहे.
जुन्या साहित्यात 'वडीलबंधू' अशी एक संकल्पना असायची. रोहित तो आहे. आपल्या प्रत्येकाचा आपल्यापेक्षा वयाने थोडा मोठा असा मित्र किंवा भाऊ असतो. जो आपल्याला जगरहाटी शिकवतो. आपलं भलं चिंततो. तो स्पूनफीड करत नाही पण मार्ग दाखवतो. मार्ग भरकटला तर कान उपटतो. रोहित युवा मंडळींसाठी हे सगळं अगदी सहजतेने करतो. काही वर्षांपूर्वी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होता. पहिल्या कसोटीत भारताचा दारुण पराभव झाला. विराट कोहली पॅटर्निटी लिव्हसाठी मायदेशी परतला. अजिंक्य रहाणेकडे नेतृत्व आलं. त्या मालिकेत प्रत्येक कसोटीगणिक खेळाडू दुखापतग्रस्त होत होते. शेवटच्या कसोटीवेळी तर नेट बॉलरला पदार्पण करावं लागेल अशी स्थिती होती. त्या मालिकेदरम्यान रोहित शर्मा फिट होऊन ऑस्ट्रेलियात दाखल झाला. रोहितच्या समावेशानंतर अजिंक्य म्हणाला, रोहित मला मोठ्या भावासारखा आहे. तो आल्याने मला बळ मिळालं आहे. युवा शिलेदार म्हणजे गार्डन में घुमने वाले मंडळींसाठी तो रोहितभैय्या आहे. काहींसाठी तो रोहितभाई आहे. काहींसाठी रो आहे. युझवेंद्र चहल त्याला रोहिता म्हणतो. तो फक्त कर्णधार नाहीये. तो घरातला आहे.
काही महिन्यांपूर्वी रोहित दोन सामन्यात शून्यावर बाद झाला. तिसऱ्या सामन्यात त्याने सुरुवात केली. एक चौकार बसला. या सामन्यात भोपळा नाही असं वाटून रोहितने हुश्श केलं पण काही मिनिटांनी पंचांनी तो लेगबाय दिल्याचं त्याला कळलं. पुढच्याच क्षणाला तो पंचांना म्हणाला, अरे वीरू थायपॅड दिया क्या? हे विचारुन तो मिश्कील हसला. पंचांनाही हा कोण आला मला विचारणारा असं वाटलं नाही. रोहितच्या बाबतीत हातचं राखून, परीटघडीचं काहीच नाही. म्हणूनच स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड होणारे त्याचे डायलॉग सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. त्याच्या बोलण्यात शिव्या असतात पण त्यांचा उल्लेख हिणवण्यासाठी, दुखावण्यासाठी नसतो. बोलण्याच्या ओघात त्या येतात. त्याचं वागणं पीआर प्रेरित नसतं. त्यामुळे त्याच्या वागण्याला मधाळ कोटिंग नसतं. तो विसरतोही. मध्यंतरी न्यूझीलंडविरुद्धच्या एका सामन्यात टॉसवेळी बॅटिंग घ्यायची की बॉलिंग हेच त्याला ठरवता येईना. न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम हसून वेडा झाला. अगदी परवा वर्ल्डकपमधल्या पाकिस्तानविरुद्धच्या मॅचवेळीही गंमत झाली. पाकिस्तानविरुद्ध मॅच म्हणजे माहोल असतो. टॉसला सगळे सज्ज झाले. रोहित नाणं उडवेल असं समालोचकाने जाहीर केलं. काही सेकंदांनंतर रोहितच्या लक्षात आलं की नाणं आपल्या खिशात आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम, मॅचरेफरी, कॅमेरा क्रू सगळे पोटभर हसले. मग टॉस झाला.
लीडरशिप आणि त्याचे फंडे यावर हजारो टेड टॉक आणि खंडीभर पुस्तकं तुम्हाला मिळतील. रोहितने या वर्ल्डकपच्या माध्यमातून मोट कशी बांधावी ते दाखवून दिलं. या संघातल्या प्रत्येकाशी त्याचं वैयक्तिक नातं आहे. लेफ्ट आर्म चायनामन कुलदीप यादवचं करिअर पूर्णत: भरकटलं होतं. कुलदीपने बॉलिंगमध्ये काय बदल करायला हवा ते रोहितने खूप आधीच त्याला सांगितलं होतं. कुलदीपने ते बदल केल्यावर रोहितने त्याला थेट अंतिम अकरात खेळवलं. सूर्यकुमार यादव रोहितचा जुना दोस्त. अनेक वर्ष कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला. सहाव्या-सातव्या क्रमांकावर यायचा. रोहितने त्याला मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आणलं. आज सूर्यकुमार कुठे आहे ते जग जाणतं. जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंडया हे दोघंही रोहितच्याच नेतृत्वात घडले, बहरले.
रोहित यशस्वी जैस्वालच्या बरोबरीने नुसता सलामीला जात नाही, तो त्याचा दादाच आहे. आयपीएलमध्ये मुंबईविरुद्ध मॅच असली की राजस्थानकडून खेळणारा यशस्वी सरावाच्या वेळी रोहितच्या बाजूला बसलेला दिसतो. जीवघेण्या अपघातातून सावरत पुनरागमन करणारा ऋषभ पंत रोहितचा दोस्त आहे. वयात बरंच अंतर असलं तरी रोहित नेहमी त्याच्या पाठीशी आधारवड होऊन उभा राहिला आहे. भारतीय संघात नवीन आलो तेव्हा दडपण वाटायचं. रोहितभाई आम्हा पोरांना घेऊन जेवायला बाहेर घेऊन जायचे, गप्पा मारायचे असं संजू सॅमसन सांगतो. रोहितभाईंची एक वेगळीच शैली आहे, त्यांच्या नेतृत्वात खेळताना खूपच मजा येते असं मोहम्मद सिराज सांगतो. तुला जशी फिल्डिंग हवेय तशी लावू, तुला जसा अटॅक करायचा असेल तसा कर असं सांगतात. अडलं तर ते त्यांचे प्लॅन्स सांगतात असं सिराज सांगतो. वर्ल्डकपदरम्यान अर्शदीप सिंगवर बॉल टेंपरिंगचे आरोप झाले. रोहितने पत्रकार परिषदेत या आरोपांचा खरपूस समाचार घेत विषयच संपवून टाकला. इंग्लंडच्या सामन्यात अक्षर पटेलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. रोहितला हा पुरस्कार मिळायला हवा होता कारण त्याच्या खेळीमुळेच एवढ्या धावा झाल्या असं अक्षर म्हणाला. संपूर्ण स्पर्धेत विराटची बॅट रुसली होती. दरवेळी रोहितला विराटबद्दल प्रश्न विचारण्यात येत होते. एकदाही त्याचं उत्तर बदललं नाही. विराट मोठा खेळाडू आहे. त्याच्या फॉर्मची आम्हाला चिंता नाही. एकाच कालखंडात खेळणारे विराट आणि रोहित खरंतर एकमेकांचे प्रतिस्पर्धीही पण ते दोघं याच्या पल्याड गेले आहेत.
नुसती नातं तयार करून, जपून होत नाही. काम बोलावं लागतं. रोहितचं काम बावनकशी आहे. वर्ल्डकप जिंकायचा असेल तर आक्रमक सुरुवात करावी लागेल हे त्याने ओळखलं. प्रत्येक सामन्यात रोहित नावाचं वादळ घोंघावत असे. हे काम चोख पार पडलं की बॉलिंगमधले बदल, फिल्डिंगमधले बदल ही जबाबदारी सुरू व्हायची. सलग ८ सामने तिन्ही आघाड्या समर्थपणे सांभाळत रोहितच्याच नेतृत्वात भारताने वर्ल्डकपवर नाव कोरलं. वनडे वर्ल्डकपमधल्या पराभवानंतर हमसून रडणाऱ्या रोहित शर्माला पाहून क्रिकेटरसिकांच्या काळजात कालवाकालव झाली होती. परवा बार्बाडोसमध्येही रोहितच्या डोळ्यात अश्रू होते पण ते विजयाचे होते. कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या मांदियाळीत स्थान पटकवायचं तर माणूसही तेवढा खास हवा. तसंच झालं!
11/07/2024
31/05/2024
24/05/2024
22/05/2024
20/05/2024
19/05/2024